Sunday, 28 January 2018

हरीश्चंद्रगडाची ट्रेक

04.11.2017
आमच्या ग्रुपची , ट्रेकर्सची पंढरी समजल्या जाणाऱ्या हरीश्चंद्र गडाची ट्रेक जाहीर झाल्यापासून मला जी उत्सुकता लागली होती ती अगदी ट्रेक पू्र्ण करे पर्यंत होती. सह्याद्रीत बरेच ट्रेक केलेले असोत पण हरीश्चंद्रगड केलेला नसेल तर तुमच्या ट्रेकींगला काही अर्थ उरत नाही. म्हणजे १०० कसोटी सामने खेळुनही लॉर्डसवर एकही कसोटी सामना न खेळण्याचं दु:ख जसे एखाद्या क्रिकेटरला बोचत असते तसेच हरीश्चंद्रगड ट्रेक न करण्याचे दु:ख एका ट्रेकरला सतावत असते. त्यामुळेच आमची ही अशी ट्रेक होती की या ट्रेकसाठी कोणीही ऐनवेळी टांग दिली नाही. सह्याद्रीची श्रीमंती एवढी अफाट आहे की आम्हा भटक्यांना गरीबीची कधी जाणीवच होत नाही. युरोप सिंगापुरच्या कृत्रिम झगमटापेक्षा सह्याद्रीचं रांगडं रुप अनुभवण्यातच मला धन्यता वाटते. आणि सह्याद्री अनुभवायचा असेल तर इथे पैशाची श्रीमंती कुचकामी ठरते. इथे हवी शरीराची श्रीमंती. सह्याद्रीत जेवढी गुंतवणुक कराल तेवढी तो दामदुप्पटीने परत करतो.
3 नोव्हेंबरच्या रात्री आम्ही १२ जणांनी शेवटची कसारा लोकल पकडली. यावेळी आमच्या ग्रुप मध्ये ट्रेक लिडर अंकुश,आकाश, रूपेश, कल्पेश, नितेश, विलास, विक्रम, केतन , मंदार, इशान आणि मी एवढे जण होतो. जेवढी थंडी अपेक्षीत धरली होती त्याही पेक्षा जास्त थंडी पडली होती. निद्रादेवीही कडकडीत थंडी बघून नाहीशी झाली. थंडीत कुडकुडत बरोबर ३.१५ ला कसारा स्टेशनला पोचलो. तिथे उतरल्यावर थंडीचे प्रमाण खुपच वाढले होते. गाडी तयारच होती. पटापट गाडी स्वताला कोंबून घेतले. ८ कमफ्रर्टटेबल सीटींग असलेल्या गाडीत १२ जणांनी बसायचे धाडस जोरदार पडलेल्या थंडीमुळे सहजशक्य झाले. कसारा ते शिर्डी फाटा पर्यंतचा रस्ता सहज पार झाला पण पुढचा प्रवास खुप वाईट होता. चालू वर्षी भरपूर झालेल्या पावसामुळे रस्त्याची हालत खड्ड्यात रस्ता अशी झाली आहे. कसारा ते खिरेश्वर या हरीश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावातील अवघे १०० कीमी आहे. पण आम्हाला पोहोचायला साडेचार तास लागले. तिथे फ्रेश होवून चहा आणि कांदेपोह्याचा कार्यक्रम पार पडला झाला. चहा आणि पोह्याचे पँकेज प्रत्येक व्यक्तीला ५० रूपये प्रमाणे होते. गरमागरम घरगुती पोह्याचे घमेले आमच्या समोर आले शिवाय पाहीजे तेवढे घ्यायची ही मुभा. कांदेपोहे महाग वाटले तरी प्रत्येकाने ५० रूपये वसूल केले. मी तर तीन वेळा कांदेपोहे घेवन उच्चांक केला. भरपेट नाष्टा करून सगळे मावळे निघालो.
हरीश्चंद्र गडावर जायला तीन वाटा आहेत. गड सर करण्यासाठी एक सावर्णे-बेलपाडा-साधले असा घाटमार्ग आहे. परंतु हा मार्ग फारच अवघड असल्याने प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असलेल्यांनीच हा मार्ग अवलंबावा. या मार्गे येण्यासाठी कल्याण-मुरबाड मार्गे माळशेजघाट चालू होण्यापूर्वी सावर्णे गावात उतरावे. येथून `बेलपाडा' या कोकणकड्याच्या पायथ्याच्या गावात यावे. येथून कड्यातून काढलेल्या साधले घाटाच्या साहाय्याने कोकणकड्याच्या पठारावर जाता येते. या वाटेलाच `नळीची वाट' असेही म्हणतात.
हरिश्चंद्रगडावर जाण्याची एक वाट पाचनई मार्गे अहमदनगर जिल्ह्यातूनही आहे. यासाठी मुंबई-नाशिक हमरस्त्यावरील घोटी या गावी उतरावे. तिथून संगमनेर मार्गावरील राजूर या गावी जावे. राजूरवरून गडावर दोन मार्गांनी चढाई करता येते.
तिसरी म्हणजे खिरेश्वरकडील वाट सोपी असल्याने लोक हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी साधारणपणे ही वाट घेतात.
आम्हीपण खिरेश्वरकडील वाट पकडली. खिरेश्वर पायथा ते हरीश्चंद्रेश्वराचे मंदीर ही ट्रेक फारशी कठीण नाहीये. सुरूवातीची चढण दमछाक करणारी आहे. काही धोकादायक ठीकाणी लोखंडी रेलींग लावल्या असल्याने सोपे होते. कातळाकड्याच्या बाजूनी जाणारी वाट रूंद असल्यामुळे बाजूची पुर्णपणे कातळी, निरसडी आणि नजर न पोहोचणाऱ्या खोलाई असलेल्या दरीची भीती वाटत नाही. पुढे कातळकड्याला वळसा घालून गेल्यावर एक ओढा लागतो तो ओलांडला की पुढे थोडे जंगल पार करावे लागते आणि ते पार केले की हरीश्चंद्रगडाचे पठार दिसते. हे अंतर चढायला आम्हाला दोन तास लागले. ग्रुप असला की सगळ्यांना सांभाळत ट्रेकींग केले जाते. शिवाय या ठिक ठिकाणावर लांबलचक फोटोसेशन घेण्यात आले. उभा, बसुन, झोपुन, आडवे पडुन, मांडी घालुन, इकडे बघताना, तिकडे बघताना. काही विचारु नका. फोटोची हौसमौज करुन घेतली. जीवाची मुंबई करुन घेतली. म्हातारपणी भाव खायला हे फोटो खुप उपयोगी पडतील. मोबाईल टेक्नॉलॉजीने फोटोवरचा खर्च एकदम शून्य करुन टाकला आहे. १०-१२ वर्षापुर्वी एवढे फोटो काढण्याचा कोणी विचारही केला नसता. न थांबता ट्रेक केले तर एक ते दिड तासामध्ये मंदीर गाठू शकतो असतो.
पठारावरील काळ्या दगडातील हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर पाहून सगळा क्षीण निघून गेला. हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे. त्यामधील कोनाड्यांमध्ये पूर्वी मूर्ती होत्या. मंदिराच्या समोर नंदी आहे. साधारण दहाव्या अकराव्या शतकात झांज राजाने बांधलेल्या १२ मंदिरांमधील हे मंदिर आहे. मंदीराच्या आवारात काही गुहा राहाण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे. मंदिराच्या मागे असणाया गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथर्‍यात जमिनीखाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत 'चांगदेव ऋषींनी' चौदाशे वर्ष तप केले होते असे स्थानिक गावकरी सांगतात. दगडात कोरलेली जागेत विठ्ठल रुख्मणी मंदीर आणि महाविष्णू सिद्धमंदीर डोळ्याचे पारणे फेडून जातात.
मंदिराच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने झालेली धळ आहे. या धळीमध्ये केदारेश्वराची लेणी आहे. यामध्ये भलीमोठी पिंड आहे. पिंडीच्या बाजूला पाणी भरलेले असते. प्रदक्षिणा मारता येते.
तारामती शिखराच्या उत्तर पायथ्याला लेणी कोरलेली आहे. ती पाहण्यासारखी आहेत.
हरीश्चंद्र किल्ल्याचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे गडाच्या पश्चिमेकडे असलेला कोकणकडा. ते आकर्षणच आम्हाला इथपर्यंत घेवून आले होते. आम्ही मंदीरापासून २० मिनिटामध्ये कोकणकड्यावर पोहोचलो. तीन हजार फूट खाली कोकणात कोसळणारा हा कडा मध्यभागी जवळजवळ ७५ फूट अंतर्वक्र आहे. कड्याच्या माथ्यावर झोपूनच (आणि जपूनच) याचे विराट रूप पहावे लागते. स्वच्छ हवा असली तर येथून कल्याणपर्यंतचा प्रदेश दिसतो. हा कडा महाराष्ट्रातील सर्वांत उंच कडा आहे. हा कडा रोमन लिपीतील यू 'U' या अक्षराच्या आकाराचा आहे. हा इतर कड्यांसारखा ९० अंशात नसून अंतर्गोल आकाराचा आहे. समोरून बघितला तर नागाच्या फण्यासारखा दिसतो.
कोकणकड्यावरून आमचा पाय निघता निघत नव्हता. तिथून निघालो तेव्हा दुपारचे दोन वाजले होते. पोटपूजा झाली होतीच. अंगाला सुखद थंडगार स्पर्श करणारा भन्नाट वारा उन व जागरणाचा त्रास जाणवू देत नव्हता. कोकणकडा ते तारामती शिखर अंतर फारसे नाहीये पण काळजाचा थरकाप उडवणारी दरी, निमुळती वाट आणि दोन शिड्यांपैकी एक डगमगणारी शिडी शिवाय दाट जंगली रानातील तीव्र चढण आम्हाला खुपच आव्हानात्मक वाटली. दोन तीन रिस्की पॉईंट पार करून तारामती शिखरावर पोचलो खरे पण शिखरावर असणाऱ्या झेंड्याकडे पोचताना एका ठीकाणी निमुळत्या वाटेवरून जाताना थंड सोसाट्याच्या वाऱ्याने आम्ही ढकलले जावू लागलो. आमचे एक चुकीचे पाऊल खोल दरीत पडायला कारणीभुत ठरले असते. वारा थांबायचे नाव घेत नव्हता. शेवटी पाठीवरची बँग पुढे घेवून खाली बसत बसत ती चार फुटाची कठीन वाट पार केली आणि खऱ्या अर्थाने दोन नंबरचे शिखर सर केले.
तारामती शिखर हे महाराष्ट्रातील कळसूबाई नंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे. उंची साधारणतः ४८५० फूट्.. शिखराच्या पोटात एकूण सात लेणी आहेत. त्यापैकी एका गुफेत गणेशाची सुमारे साडेआठ फुटाची भव्य आणि सुंदर मूर्ती आहे. याच गणेशगुहेच्या आजूबाजूला अनेक गुहा आहेत. त्यातही राहण्याची सोय होते. या शिखरावरून समोरच दिसणारे जंगल, घाटावरचा आणि कोकणातील प्रदेश न्याहाळता येतात. शिखरावर जाताना वाटेत अनेक गोमुखे लागतात. माथ्यावर दोनतीन शिवलिंगे आहेत. तसेच शिखरावरून पिंपळजोगा धरण आणि माळशेज घाटही दिसतात. शिखराच्या माथ्यावर काही काळ थांबून आम्ही मंदीराच्या बाजूने खाली उतरायला सुरूवात केली. एक टप्पा उतरल्यावर अशा एका ठीकाणी आलो की तिथे भीती काय असते आणि भीतीने गाळण कशी उडते याचा अनुभव आला. थंड वातावरणात सुद्धा घाम कसा फुटतो याचा प्रत्यय आला. उतरायला फुटभर रुंदीचे तीन दगड, बाजूला ४००० फुट खोल दरी. पाय शक्य तेवढे स्थिर ठेवले. पाय ठेवायला हजारदा विचार करायला लावणारा क्षण. देवाचे नाव घेवून दगडावर विश्वास ठेवून उतरायला सुरूवात केली. दगड कधी विश्वासघात करत नाही पण त्या खालची माती त्याला तसं करायला भाग पाडत असते. या ठीकाणी दगडांना एकाच बाजूला माती होती. त्या बाजूने दगा दिला असता तर.. हा लेख तुमच्या पर्यंत आला नसता. पण म्हणतात ना डर के आगे जीत है.. तसच झालं. गंमत म्हणजे खाली उतरल्यावर कळले या वाटेहून सोपी वाट दुसऱ्या बाजूला होती. आम्ही बाकीच्या मित्रांना ती वाट दाखवली. तिथून तासाभरात पायथ्याशी पोचलो. सगळेच दमले असल्यामुळे फोटोसेशन न होता पटापट खाली उतरलो. यथेच्छ जेवन ( unlimited जेवन जे आम्हाला जेवनाच्या बुफे पद्धतीमुळे मिळाले) करून बरोबर ५.१५ कसाऱ्याकडे कूच केली आणि ९ वाजता कसारा स्टेशन पोहोचलो.

No comments:

Post a Comment