Monday, 29 January 2018

चढाई कळसूबाई शिखरची..

चढाई कळसूबाई शिखरची..
ही ट्रेक माझ्या कायम लक्षात राहील.घरातून निघताना पडत असलेला तूफानी पाऊस पाहून वाटत होत की..जावू की नको..पण निघालो. कल्याण स्टेशनहून रात्री १.४१ शेवटची कसारा ट्रेन पकडून आम्ही ९ जण ३ वाजता कसाऱ्याला पोहोचलो..डोळ्यावर झोप होती...रपरप पडणारा पाऊस मनातील धाकधूक वाढवत होतो.पण माझा मित्र अंकूश हा एकदा तिथे जावून आला होता.. (यावेळी केवळ आमच्यासाठी आला होता) त्यामुळे अर्धी भीती नाहीशी झाली होती. कसाऱ्याहून पहाटे ४.३० वाजता आम्ही "बारी" या बेस गावाकडे निघालो.आम्ही तिथे पोहचेपर्यंत दिशा फाकल्या होत्या. पावसाचा जोर चालूच होता. गावात पोहचलो तेव्हा तिथे ट्रेकर्सची जणू जत्राच भरली होती..हजारो संख्येने ट्रेकर्स आले होते. ते सर्व पाहून झोप पार उडाली. आवश्यक तेवढे सामान घेवन सकाळी ७ वाजता ट्रेकला सुरूवात केली. आमच्या ९ जणांच्या ग्रुपमध्ये मी, अंकूश पिलाने, कल्पेश राणे, रूपेश सावंत, अवधूत सावंत, संतोष मडव, विश्राम घाडीगांवकर,गणेश कालूलकर आणि अविनाश पाटील एवढे जण होतो. ट्रेक लिडर अंकूशच्या मा्र्गदर्शनाखाली ट्रेकला सूरूवात केली. सोबत खाण्यासाठी उकडलेली मक्याची कणसे, बिस्कीटे, चिवडा,भाजलेले चणे,चहा अशी भरगच्च रसद घेतली होती. सुरूवातीला चिखलाच्या वाटेवरून चालताना खूपच घसरायला होत होतं.. चढण आणि निसरडा चिखल यातून चढाई करताना कठीण जात होते. थोडी अशी कसरत केल्यानंतर काही ठीकाणी दगडाच्या पायऱ्या आढळल्या. मात्र १ तासाच्या चढाईनंतर पुढे लोखंडी शिड्यांवरुन चढाई करताना थोड कठीण गेले. ज्यानी ट्रेकर्सना जाण्यासाठी शिड्या लावल्या आहेत त्यांना एक सलाम... ( एकूण शिखर चढाई मध्ये चार शिड्या आहे त्याही अवघड ठीकाणी.) ठीकठीकाणी खाद्य पदार्थाचें झोपडीवजा स्टॉल पाहून त्या गावकरी लोकांबद्दल आश्चर्य वाटत होतं.. पोटासाठी माणूस कोणत्याही खालच्या थराला न जाता स्वकष्ठाने  कमवत होता. चढाई करताना अर्ध्या अंतरावर अजून एक मोठी शिडी लागली. तिथे मात्र अंगावर भीतीचा काटा आला होता. ट्रेकर्सच्या झालेल्या गर्दीमुळे शिडीवरून उतरणारे आणि खालून चढणारे  यांच्यामध्ये वरचढ होती. दोन्हीकडून शिडीवरून जायला यायला घाई होत होती. शिड्या जरी मजबूत असल्या तरी एकावेळी ३० ते ३५  जणांचे  वजन त्या शिड्यांवर येत होते. त्याचीच भीती जास्त वाटली. अशीच एक शिडी जी कळसूबाईच्या शेवटच्या टोकाला होती. ती ही पार करून शिखरावर १०.३७ वाजता पाय ठेवला. शिखराच्या माथ्यावरील नजारा अवर्णनीय होता. माझ्याकडे शब्द नाहीत.. घरातून निघाल्यापासून शिखर गाठेपर्यंत जे श्रम लागले होते सर्व कुठल्या कुठे विरुन गेले. आम्ही शिखरावर पोचलो तेव्हा शिखराच्या आजूबाजूच्या लहान मोठ्या पर्यंत रांगाना स्पर्श करणारे ढग विरळ होते. त्यामुळे आजूबाजूचा नजारा स्वर्गीय होता..एका बाजूला रतन गड आणि तिथून काही अंतरावर भंडारदरा डँम पाहावसास मिळत होते..एका बाजूने छोट्या छोट्या पर्वतांचे सुळके हीरवेगार झाल्यावर फारच विलोभनीय वाटत होते आणि ढगांची पांढरी दुलई त्यांवर खुपच शोभून दिसत होती. शिखराचा माथा फारसा मोठा नाहीये. मधोमध असलेले कळसूबाई मातेचे मंदीर छान दिसते. सुमारे १ ते १.३० तासानंतर शिखराच्या चारी बाजूला ढगांचे आच्छादन आल्यावर आम्ही उतरायला सुरूवात केली. त्यावेळी माझ्या मित्रांच्या मते माझ्यामुळे आम्ही सर्वजण एका चांगल्या अर्थाने ढगात होतो. उतरताना लोखंडी शिड्या सोडल्या तर फारसा त्रास झाला नाही. दुपारी १.४५ वाजता शिखराचा पायथा गाठला. तिथून परतीचा प्रवास सुरू झाला आणि आमच्या आयूष्यात अजून यशस्वी चढाई नोंदली गेली.

No comments:

Post a Comment