Sunday, 28 January 2018

कोथळीगड - पेठ कील्ला..

कोथळीगड - पेठ कील्ला..
२६.११.२०१७
गडावरच्या प्रत्येक पावलावर इतिहास कोरून ठेवलाय,या सह्याद्रीचा प्रत्येक दगड इतिहासाचा भाग आहे. आज परत एकदा सह्याद्रीच्या कुशीत जायचा योग आला.
पण यावेळचा योग थोडा वेगळा होता. यावेळी बाईक स्वारी होती. माझ्यासाठी हा अनुभव नवीन होता. पण माझ्या मित्रांनी तो जुळवून आणला आणि मी , मिलिंद , विनायक आणि हेरंब असे चार जण निघालो कोथळीगड सर करायला. आम्हाला त्या ठिकाणीबद्दल काहीच माहीती नव्हती पण तिथे गेल्यावर एक सुखद आठवण मात्र घेवून आलो.
भल्या सकाळी ६ वाजता थंडीतून आम्ही निघालो तेव्हा थंड झोंबणारा वारा आणि बाईक स्वारी मनाला सुखावत होती. रस्ता बऱ्यापैकी चांगला होता. बदलापुरहून निघाल्यावर नेरळ पश्चिम वरून कशेळे कडे जाणारा रस्ता पकडला. कशेळे ते आंबवली हा रस्ता फारच सुबक आणि छान आहे.
साधारणपणे ८.१५ आम्ही आंबवली गावात पोहोचलो. तिथून पेठ गावाकडे जाणारा रस्ता सुरूवातीला बरा होता पण १ किमी आत गेल्यावर तीव्र चढण, रस्त्यापासून सुटलेले दगड, माती यामुळे आम्हाला आमच्या बाईक्स मध्येच सोडून जावे लागले. या रस्त्यावरून पुढे बाईक्स गेल्याच्या खुणा होत्या. शिवाय गावात जाऊन असे समजले की त्याच रस्त्यावरून गावातली लोक ट्रिपल सीट घेवून बाईकने प्रवास करतात. धन्य ते गावकरी. बाईक्स पार्क करून आम्ही चालत सुटलो. चढाईचा पूर्ण रस्ता दमछाक करत होता. सकाळची वेळ असल्यामुळे घाम निघत नव्हता. तासाभराची चढण पार केल्यावर आम्ही 'पेठ' गावात पोचलो. समोर दिसणरा कोथलीगडाचा सुळका आम्हाला खुणावू लागला. थोडी विश्रांती करून चढाईला सुरूवात केली. गडाच्या पायथ्याशी ‘पेठ‘ हे गाव आहे या गावाहून वर गडावर चढण्याचा मार्ग दमछाक करणारा आहे. पण वाटेवरील करवंदांची आणि चाफ्याची झाडे ही वाटचाल सुखावह करतात. ठीकठिकाणी सापाच्या कातही पाहायला मिळते. ही वाट सरळ किल्ल्याच्या प्रवेशव्दाराशी घेऊन जाते. या चढाई दरम्यान घरून नेलेले कांदे पोहे आणि उपमा या पदार्थानी नाष्टाला लज्जत आणली. आम्हाला गडावर पोचायला १ तास लागला. गडावर गावातली छोटी मुले सरबत विकताना दिसतात. परिस्थितीपुढे आणि निसर्गापुढे हात न टेकता अगदी सहजरित्या ही मुलं गड चढतात आणि सरबत विकण्याचे काम करतात. त्यांचे निरागस चेहरे बघून आपल्याला सरबत विकत घेण्यापासून राहवत नाही. खुप कष्ट करतात ही मुलं.
गडाच्या द्वारापाशी पोहचल्यावर गुहेजवळच एका ऊर्ध्वमुखी भुयारात किल्ल्याच्या सुळक्यावर जाण्यासाठी व्यवस्थित पायर्‍या कोरलेल्या आहेत. दगडातील अप्रतीम कोरीव काम गड चढताना आलेला सगळा क्षीण दूर करते. पायऱ्यांवरून जाणारा मार्ग एक दोन ठिकाणी खुपच धोकादायक आहे. अरूंद पायऱ्यांची वाट आणि बाजूला खोल दरी नवगिर्यारोहकाला काळजात धडकी भरवल्याशिवाय राहत नाही. गडाचे बांधकाम अजूनही सुस्थितीत आहे.
पायर्‍यांच्या मार्गावर उजवीकडे गज शिल्प कोरलेले आहे. पायर्‍यांच्या शेवटी दगडात कोरून काढलेला दरवाजा आहे. त्यावर शरभ शिल्प आहे. गडमाथ्यावर पाण्याची दोन टाकी आहेत. गडमाथ्यावरुन भीमाशंकरकडील कलावंतिणीचा महाल, नागफणी, वाघाचा डोळा, सिद्धगड, कल्याणकडील हाजीमलंग, चंदेरी, प्रबळगड, इर्शाळगड, माणिकगड, माथेरानचे पठार हा विस्तृत मुलूख नजरेच्या टप्प्यात येतो. एका बाजूला वाऱ्यासोबत फिरत असलेल्या पवनचक्क्याही दिसतात.
गडमाथ्यावरुन परत गुहेजवळ येउन सुळक्याला प्रदक्षिणा घातलताना वाटेत पाण्याच्या टाक्यांचे दोन समुह व एक लेण पाहायला मिळते. याशिवाय गडावर प्रवेशव्दाराच्या उजवीकडे खाली उतरल्यावर तसे गावात मारुती मंदिरा जवळ सप्तधातूनी बनवलेली तोफ पाहायला मिळते.
साधारणपणे ११.३० आम्ही गड उतरायला सुरूवात केली आणि तासाभरात पेठ गावात येउन एका सुंदर झोपड्यात जेवन केले. तिथून परत १ तासाची उतरण पार करत जिथे बाईक्स पार्क केल्या होत्या तिथे आलो. आणि परतीचा प्रवास सुरू झाला.
गडाचा इतिहास..
कोथळीगड हा कर्जतपासून ईशान्येला साधारण २१ किमी अंतरावर आहे. राजमाची आणि ढाक किल्ल्र्‍यांच्या आणि सिध्दगड, भीमाशंकरच्या अलीकडे दाट झाडीतून आपला उत्तुंग कातळकडा उभारून हा किल्ला इतिहासाची साक्ष देत उभा आहे.
औरंगजेबाने नोव्हेंबर १६८४ मध्ये अब्दुल कादर व अलईबिरादरकानी र्‍यांना संभाजींच्या ताब्यातील किल्ले घेण्यासाठी पाठवले. ’कोथळागड’ हा महत्त्वाचा असून जो कोणी तो ताब्यात घेईल, त्याचा ताबा तळकोकणावर राहील हे लक्षात घेऊन अब्दुल कादर याने हा किल्ला घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तो या किल्ल्याच्या जवळपास गेला आणि तेथे राहणार्‍या लोकांना त्याने आपले नोकर म्हणून ठेवून घेतले. मराठे या किल्ल्यातून शस्त्रांची नेआण करतात, हे कळताच अब्दुल कादर व त्याचे ३०० बंदूकधारी नोव्हेंबर १६८४ मध्येच गडाच्या पायथ्याशी पोहोचले. मराठ्यांनी त्र्‍यांना मागे हटवले, पण तरीही काही लोक किल्ल्याच्या मगरकोट दरवाज्याजवळ पोहोचले आणि त्यांनी ‘दरवाजा उघडा‘ अशी आरडाओरड सुरू केली. किल्ल्यावरील मराठा सैन्याला वाटले की आपलेच लोक हत्यारे नेण्यासाठी आले आहेत, म्हणून त्यांनी दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच मोगल सैनिक आत शिरले मराठे व मोगल र्‍यांच्यात लढाई झाली. अब्दुल कादरच्या मदतीसाठी माणकोजी पांढरेही आले, झालेल्या लढाईत मोगलांना यश आले.
दुसर्‍याच दिवशी मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला, फार मोठी लढाई झाली. या लढाईत बाणांचा व बंदुकींचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला.या लढाईत किल्ल्यावरचा दारूगोळा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. गडावर जाणारी सामुग्री मराठ्यांनी लुटल्यामुळे मुघल सैन्याला दारूगोळा व धान्य मिळेनासे झाले. दरम्यानच्या काळात अब्दुल कादरच्या मदतीला कोणीच न आल्यामुळे त्याची परिस्थिती कठीण झाली. वेढा टाकल्यानंतर दहा बारा दिवसांनी जुन्नरचा किल्लेदार अब्दुल अजिजखान याने आपला मुलगा अब्दुलखान याला सैन्यासह अब्दुल कादरच्या मदतीला पाठवले. अब्दुलखान तेथे पोहचला तेव्हा त्याची वाट अडवण्यासाठी मराठ्यांचा सरदार नारोजी त्रिंबक र्‍यांनी तेथील खोरे रोखून धरले होते. येथेही लढाई झाली नारोजी त्रिंबक व इतर सरदार धारातीर्थी पडले आणि कोथळागड मुघलांच्या ताब्यात गेला. इहमतखानाने नारोजी त्रिंबकाचे डोके रस्त्यावर टांगले किल्ला जिंकून सोन्याची किल्ली औरंगजेबाकडे पाठवण्यात आली. औरंगजेबाने कोथळागड नावाचा असा कोणता गड अस्तित्वात आहे का? याची खात्री करून मगच अब्दुलखानाला बक्षिसे दिली. मुघलांनी गडाला ‘मिफ्ताहुलफतह‘ (विजयाची किल्ली) असे नाव दिले. फंदफितुरीमुळे मराठ्यांच्या हातून हा मोक्याचा किल्ला निसटला.
गड परत मिळवण्यासाठी मराठ्यांनी प्रयत्न सुरू केले. डिसेंबर १६८४ मध्ये गडाकडे जाणार्‍या मुघल सैन्याला मराठ्यांनी अडवले. नंतर मऱ्हामतखानालाही ७००० मराठ्यांच्या तुकडीने अडवले. पण मराठ्यांना यश लाभले नाही. त्यानंतर एप्रिल १६८५ मध्ये ७०० जणांच्या तुकडीने पुन्हा हल्ला केला. २०० जण दोरीच्या शिडीच्या मदतीने किल्ल्यात उतरले. बरेच रक्त सांडले, पण मराठ्यांची फत्ते होऊ शकली नाही. मराठ्यांनी हा महत्त्वाचा किल्ला गमावला होता. पुढे १८१७ च्या नोव्हेंबरमध्ये दुसर्‍या बाजीराव पेशव्याच्या वतीने बापुराव नामक शूर सरदाराने हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यातून सोडवला. सुमारे १८६२ पर्यंत किल्ल्यावर माणसांचा राबता होता.
पहाण्याची ठिकाणे :पायथ्याजवळच्या पेठ गावातून चहुबाजूंनी तासल्या सारखा पेठचा सुळका दिसतो. पायवाटेने वर पोहोचल्यावर पायर्‍यांचे व प्रवेशव्दाराचे अवशेष दिसतात. पुढे कातळाच्या पोटात खोदलेल्या गुहा दिसतात. प्रथम आहे ती देवीची गुहा, पाण्याचं टाके आणि मग डावीकडे ऐसपैस अशी भैरोबाची गुहा. या गुहेचे वैशिष्ट्य म्हणजे सपाट, समतल भूमी आणि छताला आधार देणारे कोरीव नक्षीदार खांब. गुहेत ४५ ठिकाणी गोल खळगे आहेत आणि काही जूने तोफेचे गोळे आहेत.
पोहोचण्याच्या वाटा :१)कर्जतहून एस्‌टी ने कशेळे मार्गे आंबिवली या गावात जावे. हे अंतर साधारण ३० किमी आहे.
२) नेरळहून येताना कशेळे या गावी यावे आणि जामरुखची एस्‌टी पकडून आंबिवली गावात यावे.
राहाण्याची सोय : भैरोबाच्या गुहेत २० - २५ जण व्यवस्थित राहू शकतात.
पाण्याची सोय :- गडावर बारामाही पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत.
जाण्यासाठी लागणारा वेळ :- आंबिवली गावापासून २ तास लागतात, तर पेठ गावापासून १ तास लागतो.
कधी वेळ मिळाला तर या किल्ल्याला नक्की भेट द्या.
शब्दांकन :- नितीन राणे ( कणकवली )
९००४६०२७६८.

No comments:

Post a Comment