Sunday, 28 January 2018

एक अविस्मरणीय ट्रेक - हरीहर

एक अविस्मरणीय ट्रेक- हरीहर
२६ जानेवारी २०१८
हरीहरगडाचा फोटो मी खुप वर्षापुर्वी फेसबुकला पाहीला होता. तो फोटो बघुनच भीतीने मनात धडकी भरली होती. तेव्हा ट्रेकचे भूत लागलं नव्हतं. कोणी लाख रूपये दिले तरी इथे जाणार नाही आणि आता जेव्हा पासुन ट्रेकींगचे वेड लागलयं तेव्हा पासून या गडावर जायचे वेध लागले होते. चार पाच वेळा प्लान्स बनून पण फिसकटले होते. हरीहरगड ओळखला जातो तो पायऱ्यांमुळे! त्या गडावरील कातळात कोरलेल्या पायऱ्या मनावर छाप उमटवतात! भटका माणूस रायगडावर जाऊन जसे टकमक टोक, बाजारपेठ, दरबार विसरत नाही किंवा राजगडावर जाऊन जसे तेथील बालेकिल्ल्याचे चित्र पुसून टाकू शकत नाही किंवा हरिश्चंद्रगडावर जाऊन जसा कोकणकड्याचा अजस्त्र आविष्कार आयुष्यभर मनात ठेवून वावरत राहील, तसाच
प्रकार हरिहरगडाच्या पायऱ्यांच्या बाबतीत घडतो! गडांच्या यादीतील थोडे वेगळे नाव आणि तसेच आडवाटेवरचे स्थान म्हणजे हरिहर!
गेल्याच महीन्यात गोरखगड केला तेव्हा काहीजण बोलले होते गोरखगडच्या तुलनेत हरीहर गड ट्रेकींगसाठी सोपा आहे. गोरखगडने आपली अवघडता कायम ठेवलीय पण लोक हरीहरच्या प्रेमात जास्त आहेत. त्यातलाच मी.
आमच्या रेग्यूलर ग्रुपचे कलावंतीन स्टे पाठोपाठ इरशाळगडचा प्लान देखील फसला. त्यात सलग तीन सुट्टया काही प्लान नाही बनवले तर महाराज मात्र रागवतील. म्हणुन मी आणि माझा एक मित्र अमित जो पहील्यांदाच ट्रेक ला तयार झाला होता, माहुलीगडाचे प्लान करत होतो. त्याची माहीती घेण्यासाठी मी माझ्या एक फ्रेंडला कॉल केला. पण ते सर्व जण नाशिकला जाणार होते आणि त्यांच्या अजेंड्यामध्ये हरीहर गड पहीला होता. हे ऐकून माझ्या तोंडाला पाणी सुटले. डोक्यातून माहूलीगड तात्पुरता बाजूला झाला आणि त्याची जागा हरीहरने घेतली. मी संध्याकाळी रेल्वेच्या तिकीट्स बुक केल्या.
रात्रीच्या ट्रेनने आम्ही मुंबईहून सहा जण नाशिकला निघालो तेव्हा थोडीफार थंडी होती. पण जेव्हा पहाटे ४ वाजता नाशिकला उतरलो तेव्हा थंडीचा कहर अनुभवयास मिळाला. त्यावेळी माझ्या मनात आले आपले एवरेस्ट बेस कँप ट्रेकचे स्वप्न कसे पुरे होणार? आम्हाला नाशिक स्टेशनला न्यायला आमचे मित्र बाईक घेऊन आले होते. मी पहील्यांदाच भल्या पहाटे दातओठ खाणाऱ्या थंडीत बाईक राईड अनुभवली. हॉटेलला पोहोचेपर्यंत ५ वाजले होते. तिथे फ्रेश होऊन मित्रांनीच बनवलेला वर्डक्लास चहा आणि पोह्यावर यथेच्च ताव मारत आम्ही सकाळी ७ ला त्रिंबक हर्शवाडी च्या दिशेने रवाना झालो. सुर्य उगवला तरी थंडी कमी झाली नव्हती. मुंबई आग्रारोडने जात असताना काही अंतरावर अंजनेरी पर्वत लागला. पुढे रस्त्याच्या बाजुला सर्व पर्वतच उभे ठाकले होते. आम्ही हर्षवाडी गावात पोहोचलो तेव्हा सकाळचे ९ वाजले होते. उन्ह वर येऊन पण हवेत कमालीचा गारवा होता.
हरीहरच्या मुख्य पायऱ्यांपर्यंत पोहोचायला आम्हाला १ तास लागला. पायथ्या पासून तिथपर्यंत जायला दोन खड्या चढणी पार कराव्या लागतात. वाट मळलेली आहे पण बऱ्याच ठीकाणी निसरडी आहे. चढताना खुप जपून चढावे लागते. आम्ही हरिहर गडाच्या रेखीव पायऱ्यांपर्यंत तासाभरात पोचलो. समोर पाहीले तर तेथील दगडी जिना मनातील धाकधुक वाढवत होता. ही दगडी वाट वाटही वैशिष्ट्यपूर्ण आहे. साधारण ऐंशी अंशाच्या कोनामध्ये सरळ रेषेत ती जणू आभाळात घुसते. ती वाट चढण्यास सुरुवात केली, की त्याला तिचा खरा अंदाज येतो. एकावेळी एकच मनुष्य वर किंवा खाली जाईल अशा पद्धतीची तिची रचना आहे. पायऱ्यांवर दोन्ही बाजूंनी खोबण्या आहेत. त्‍यात पंजा रुतवता येतो व वर चढताना त्यांचा आधार मोठा ठरतो. सुमारे नव्‍वद पायऱ्यांचा सोपान चढल्‍यानंतर गडाचे पहिले छोटेखानी पण सुरेख प्रवेशद्वार लागते. त्या प्रवेशद्वारातून आलेली वाट पाहिली तर असे लक्षात येते, की वर येणे एकवेळ सोपे, मात्र उतरणे महाकठीण. आम्ही एका मागोमाग एक असे फक्त आणि फक्त पायऱ्यांवर लक्ष केंद्रीत करत वर चढत होतो. मागे वळून बघायची हिम्मत होत नव्हती. आ वासलेली भयानक काताळी दरी पाठीशी होतीच. एका छोट्याश्या चुकीचे थेट मृत्युत रूपांतर. मला फक्त प्रत्येक पायरीच्या खोबण्या दिसत होत्या. तसेच वरून खाली येणाऱ्या एखाद्या ट्रेकरला जागा करून देताना मात्र आमची पंचायत होत होती. पण आम्ही तो अवघड जिना चढलो. त्यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्या सारखा होता. आमच्या मध्ये पहील्यांदाच ट्रेक करणारे दोघेजण होते. त्यांचा आनंदाला तर सीमाच उरली नव्हती. या पायऱ्या चढून आल्यावर शेंदुरी रंगाच्या प्रवेशद्वाराच्‍या शेजारी गणेशाची शेंदूर फासलेली छोटी मूर्ती दिसते. प्रवेशद्वाराच्या पुढे, गडाच्या पोटात खोदलेला रस्ता आहे. उलट्या ‘सी’ इंग्रजी आकारासारखा किंवा नारळाच्या अर्ध्या करवंटीसारखा. कातळात कोरलेले दोन दरवाजे पार केल्‍यानंतर सुमारे एकशे तीस पायऱ्यांचा दगडी जिना लागतो. त्‍या जिन्‍यासही दोन्‍ही बाजूंस आधारासाठी खोबणी आहेत. त्याच्याच पुढे, वर जाण्यासाठी अप्रतिम असा दगडी बोगदा आहे. गडावर एकापेक्षा एक सरस सौंदर्याकृती पायघड्या टाकून पुढे येत राहतात. त्यामुळे एका रचनेचे कौतुक करायला जावे तर दुसरी समोर! वास्तुस्थापत्याचे ते सौंदर्यतुषार झेलतच गडाच्या माथ्यावर वावर चालू राहतो. त्या पायऱ्या चढताना विशेष काही वाटले नाही. एक बाजू एक्सपोज होती पण दोन्ही बाजूला आधार होता.
हरिहर किल्ल्याचा शेवटचा छोटा दरवाजा पार करून थोडे पुढे गेल्यावर डाव्या हाताला खालच्या बाजूस गुहा दृष्‍टीस पडते. पण तेथे उतरण्यासाठी दोराची आवश्‍यकता भासते. गडमाथ्यावर मोठा तलाव आहे. पश्चिमेकडे भिंत बांधून त्या तलावाचे पाणी अडवण्‍यात आले आहे. तलावाच्‍या काठावर हनुमानाचे मंदिर असून शेजारी उघड्यावर असलेले शिवलिंग आणि नंदी आहेत. गडाच्या टोकाला दारुगोळा कोठाराची इमारत आहे. त्या इमारतीभोवती पाण्याची सहा टाकी दिसतात. लहान मोठ्या टाक्यांची रचना मन मोहवून जाते किल्ल्यावरील सर्वांत उंच जागा चढायला पण थोडी कसरत करावी लागली. गडाच्या माथ्यावरून सभोवारचे विहंगम दृश्‍य फार छान दिसते. तेथून पूर्वेकडे दिसणारे त्र्यंबक डोंगररांगेचे चित्र डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. उत्तरेच्‍या दिशेला वाघेरा किल्‍ला तर दक्षिणेकडे वैतरणा तलावाच्या पार्श्वभूमीवर उभे असलेले कावनाई व त्रिंगलवाडी किल्ल्यांचे डोंगर फार आकर्षक दिसतात. हरीहरच्या सर्वात उंचीच्या माथ्यावरून दिसणारे दृश्य विहंगम होतेच पण पहील्यांदाच प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आम्ही तिरंगा फडकविला होता. खरोखर माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण ठरला. त्याचे सर्व श्रेय अजिंक्यला जाते, त्याची ती आयडीया. सर्वात उंच माथ्यावर राष्ट्रगीत म्हणताना आमची छाती मात्र अभिमानाने फुलली होती. एक वेगळाच रोमांच अंगावर आला होता.
तिथून खाली उतरल्‍यानंतर आम्ही उतराच्या वाटेवर एका झाडाखाली नाशिकमधल्या रवी या मित्राने घरून आणलेल्या जेवनाचा आस्वाद घेऊन पुढच्या मार्गाला लागलो. थोडं खाली उतरल्यावर समोर घुमटाकार माथा असलेली तीस फूट लांब व बारा फूट रुंद अशी दगडी कोठी दिसते. पूर्वीच्‍या काळी तेथे दारूगोळा साठवला जाई. कोठीचे प्रवेशद्वार छोट्या खिडकीसारखे असून त्या कोठीत दिवसासुद्धा काळोख असतो. ती गडावरील छत शाबूत असलेली एकमेव इमारत आहे. तेथून समोर दिसणारा ब्रह्मा डोंगर फार सुंदर दिसतो. हरिहरगडाची फेरी पूर्ण करण्यास सुमारे दोन तास लागतात. गड पाहून परत उतरताना पुन्‍हा त्‍या सरळसोट पायऱ्या समोर येतात. त्या फारच धडकी भरवणाऱ्या होत्या. त्‍यामुळे उतरताना विशेष काळजी घ्‍यावी लागत होती. प्रत्येक पाऊल योग्य दिशेने पडायला हवं होतं. काही ठिकाणी पायऱ्या एवढ्या बाहेर आल्यात की थोडं जरी पाऊल पुढे पडले तरी थेट दरीत रवानगी होणार होती. त्यामुळे दरीकडे पाठ करूनच उतरावे लागत होते. याच कारणास्तव उतरायला वेळ लागत होता. तेही पार करत आम्ही गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराशी पोचलो पण खालून वर येणाऱ्या ट्रेकर्सची संख्या खुप होती. त्यामुळे आम्हाला उतरायला जागा मिळत नव्हती . पंधरा मिनिटांच्या प्रतिक्षेनंतर उयरायला जागा मिळाली. तेव्हा मला कळसुबाई ट्रेकची आठवण झाली. तिथे पण लोखंडी शिडीवर जाणाऱ्या येणाऱ्यांची गर्दी झाली होती आणि एका एका शिडीवर ६० ते ७० लोक जाण्या येण्याचा प्रयत्न करत होते. इथे पण ट्रेकला जत्रेचे रूप आले होते. यात रात्री स्टे करणारे उशीरा चढत होते. प्रवेशद्वारापासूनच्या पायऱ्या उतरताना पण खुप काळजी पूर्वक उतरावे लागत होते. इथे पण आम्ही दरी कडे पाठ करत एक एक पायरी खाली उतरलो. खऱ्या अर्थाने इथेच ट्रेक संपते असं काहीना वाटते पण त्या नंतर चढताना लागली खडी चढण उतरताना मात्र अवघड होऊन बसते. काही ठीकाणी बसून उतरल्याशिवाय पर्याय उरत नाही. अशा रितीने एक रोमांचकारी ट्रेक पुर्ण करून नाशिकहून मी आणि अमित मुंबईकडे परत निघालो.
हरीहरचा इतिहास (माहीती whatsapp वरून प्राप्त)
गडावरील कातळात पायऱ्या कोरण्‍याची पद्धत सातवाहन राजवटीपासून चालत आली आहे. बहुतांशी गडांवर तशा पायऱ्या दिसतातही; परंतु अनेक ठिकाणी त्या कालौघात, विशेषत: इंग्रजांनी १८१८ मध्ये केलेल्या विध्वंसात नष्ट झाल्या.
हरिहर हा नाशिक जिल्ह्यातील क्षेत्र त्र्यंबकजवळील हर्शवाडी गावानजीक वसलेला गड. त्‍याचे स्‍थान ब्रम्‍हगिरीच्‍या पश्चिमेस सुमारे वीस किलोमीटर अंतरावर आहे. हरिहर किल्‍ला अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता. शहाजीराजांनी १६३६ साली त्‍याशेजारच्‍या त्र्यंबकगडासोबत तोही किल्ला जिंकून घेतला. नंतर त्याचा ताबा मोगलांकडे गेला. पुढे, १६७० मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी तो गड जिंकून स्वराज्यात मोलाची भर घातली. मोगल सरदार मातब्बरखान याने हरिहर किल्ला ८ जानेवारी १६८९ रोजी जिंकला. शेवटी, १८१८ मध्ये तो गड मराठयांच्या ताब्यातून इंग्रजांनी जिंकून घेतला. इतिहासात अशी विविध मालकी अनुभवणारा त्र्यंबकगडापाठोपाठ हरिहरगड हा त्या भागातील दुसरा महत्त्वाचा किल्ला आहे.
हरिहरगड ‘हर्शगड’ या नावानेदेखील ओळखला जातो, त्याचे कारण त्याच्या पायथ्याला ‘हर्शवाडी’ नावाचे गाव आहे. हरिहरगडाचा त्रिकोणी आकार, त्‍याच्‍या कातळात कोरलेल्या पायऱ्या, पुढे कोठालीगड (पेठ) प्रमाणे उभ्या कोरलेल्या पायऱ्या आणि गडावरील इतर दुर्गावशेष अशा साऱ्याच गोष्‍टी वैशिष्‍ट्यपूर्ण आहेत. तो किल्‍ला समुद्रसपाटीपासून ११२० मीटर उंचीवर उभा आहे. मराठेशाही बुडवण्याच्या १८१८ सालच्या इंग्रजांच्या धडक कारवाईत कॅप्टन ब्रिग्ज या इंग्रज अधिकाऱ्याने हरिहरगड जिंकून घेतला. मात्र गडाच्या पायऱ्या बघून तो आश्चर्यचकित झाला व उद्गारला, “या किल्ल्याच्या पायऱ्यांचे वर्णन शब्दांत करणे कठीणच. सुमारे दोनशे फूट सरळ व तीव्र चढाच्या या पायऱ्या अतिउंच ठिकाणावर बांधलेल्या एखाद्या जिन्यासारख्या वाटतात”. त्या वेळी इंग्रजांचे धोरण गिरिदुर्गांच्या वाटा व प्रवेशमार्ग तोफा लावून उद्ध्वस्त करण्याचे होते. त्यानुसार त्यांनी अनेक गडांचे मार्ग उद्ध्वस्त केले. त्‍यात अलंग-मदन-कुलंगगड, सिद्धगड, पदरगड, औंढा इत्‍यादी किल्‍ल्‍यांचा समावेश होतो. पण हरिहर किल्ल्याच्या अनोख्या पायऱ्यांनी त्‍यांच्‍या राकट सौंदर्याची मोहिनी कॅप्टन ब्रिग्जवर घातली. त्‍यामुळे त्याने हरिहरगड जिंकून घेतला, पण त्या सुंदर पायऱ्यांच्या मार्गाला धक्‍काही लावला नाही. यावरूनही त्‍या पायऱ्यांची आकर्षकता किती विलोभनीय असेल याचा अंदाज बांधता येतो.
जगदंब..
नितीन राणे
९००४६०२७६८

No comments:

Post a Comment