Sunday, 28 January 2018

ढाक बहीरीचा थरार..

ढाक बहीरीचा थरार....

09.12.2017

राजगडचा बालेकिल्ला चढताना माझा मित्र अंकुश मला बोलला होता. आपण एकदा ढाक बहीरीला जाऊ. तिथपासून मनात होतचं. यु ट्युबवरील व्हीडयो पाहून मनाची तयारी होत नव्हती. शेवटी योग जुळून आला. आम्ही बँगा भरल्या. सकाळी लवकर निघायचे ठरले. अंकुश कांजूरमार्ग वरून येणार होता. मी आणि इतर दोन मित्र बदलापुर हून जाणार होतो. मी, अंकुश, मिलिंद आणि विकी असे चौघेजण होतो. सकाळी ६.३० वाजता बाईक काढल्या, बोचरी थंडी आणि दुलई पांघरलेले धुकं. आमचा वेग कमी करत होती. धुक्यातून बाईक राईड म्हणजे पर्वणीच. पाच दहा मिनटातच सगळे अंग पांढऱ्या दवबिंदूनी घेरले गेले. डोळ्याच्या पापण्यावरील दवबिंदू तर अवर्णनीय दिसत होते. बदलापूर ते कर्जत या तासाभराच्या अंतरात आम्ही दवबिंदूनी भिजून गेलो. कर्जतला चहा नाष्टा घेवून सांडशी या गावाकडे प्रस्थान केले. तिथून साधारणपणे पाऊन तासात सांडशी गावात पोचलो. गावात पोहोचल्यावर धुकं बरेचसे गायब झाले होते. सुर्यदेव हळहळू डोकावू लागले होते. गावातून दिसणारा ढाक बहीरी लेण्याच्या बाजूचा कडा नजरेत भरत होता. त्या कड्या बाजूलाच बहीरी लेणी असतील असं आम्हाला बिलकुल वाटले नव्हते. अत्यंत कठीण श्रेणीच्या ट्रेकची सुरूवात ९ वाजता झाली. गंमत अशी की सुरूवातीलाच आम्ही रस्ता चुकलो , लेण्यांकडे जाणारी डोंगराकडील वाट सापडत नव्हती. आदीवाशी पाड्याकडून उजवीकडे न जाता आम्ही डावीकडे वळलो होतो. तिथेच चुकलो होतो. रस्ता चुकल्यामुळे जिथून सुरूवात केली तिथेच परत आलो. इतक्यात चार पाच जनांचा एक ग्रुप आमच्या दिशेने येताना दिसला. त्यांच्यासोबत आदीवाशी पाड्यातील एक वाटाड्या होता. त्यांना आमच्या पुढे जाऊ देत काही अंतर मागे राहत मागोमाग चालत राहीलो. १५ ते २० मिनिटे
चालल्यावर तीव्र चढण सुरू होते. ही चढण तीन टप्प्या मध्ये म्हणजेच तीव्र चढणीचे दोन डोंगर पार करून तिसऱ्या टप्प्यात कडा पार करुन लेण्या पर्यंत पोहोचता येते.
आमचा पहीला टप्पा खुपच दमछाक करणारा ठरला. कडक उन आणि तीव्र चढणीमुळे लवकर दमायला होत होतं. त्यामुळे वेळही लागत होता. काही ठीकाणी वाटेतील दगडामुळे घसरायला होत होते. जस जसे वर जात होतो. तसतशी बाजुची दरी खोल आणि भीषण वाटत होती. खरतर अशा प्रकारची वाट माझ्या आवडीची. छान वाटते. सुरूवातीला भीती वाटायची, आता नाही. पहीला टप्पा पार करायला सुमारे दिड तास खर्ची करावा लागला. थोडी सपाट वाट आली तसं बरं वाटले पण तेही काही क्षण टिकले. परत चढण सुरू झाली. समाधानाची गोष्ट म्हणजे ही चढण राजमाचीच्या घनदाट निबीड जंगलातून होती. त्यामुळे सावली आम्हाला वरदान ठरू लागली. पक्षांचे वेगवेगळे आवाज आमचे मनोरंजन करू लागले. दुसरा टप्पा जरी खतरनाक चढणीचा असला तरी बाजूला दरी नव्हती आणि डोक्यावर उन ही. एका ठीकणी एक मुलगा जंगलात औषधी मुळ्या शोधताना आढळला. त्याच्या म्हणण्यानुसार घनदाट जंगलात अशा बऱ्याच औषधी प्रकारच्या मुळ्या होत्या.
दुसरा टप्पा पार करायला १ तास लागला. चढण संपून जेव्हा थोडा सपाट प्रदेश लागला तेव्हा हायसे वाटले. एक ठिकाणी दगडातील दिपस्तंभ आढळला. तिथेच एका पाषाणी दगडाच्या बाजूला पाच सहा लोखंडी त्रिशुल दिसली. आजुबाजूची जागाही स्वच्छ दिसत होती. तिथे एका प्रकारचा शांतपणा वाटला.
आता इथून खरी कसोटी होती. परत एकदा घनदाट जंगलातून जीवघेणी चढण सुरू झाली. थोड पुढे गेल्यावर बहीरी लेण्याच्या कड्यातला चिर दिसला. सोबत भगवा झेंडा आणि कड्यावरून खाली लोंबणारा पांढरा दोर. हे सगळे बघुनच काळजात धस्स झाले. ते आमचे फायनल डेस्टिनेशन होतं. एवढं भयानक चित्र नजरे समोर होतं. मनातून भीती वाटत होती. पण तिथे उत्सुकता देखील होती. थोडा वेळ दाट जंगलातील चढण पार केल्यावर पुढे जंगल संपलं. नजरे समोर आ वासला तो भयानक कडा आणि कड्यातील चिर. तो आता मोठा दिसू लागला. अजून कड्या पर्यंत जायला बरीच धोकादायक चढण पार करायची होती. धोकादायक अशा साठी बोलतोय की, चढणीची वाट म्हणजे पावसाची पाणी वाहून जाण्याची जागा होती. वाटेत कमालीचा उंच सखलपणा होता. चालताना पायाखालचे दगड घसरत होते. पुढे बघायची सोय नव्हती. समोरचा भयानक कातळी कडा मनात धडकी भरवत होता. मनात घालमेल चालूच होती. आपण जेवढे चढलोय तेवढेच उतरायचे देखील आहे. कड्याच्या मुळात पोहचायला आम्हाला बराच वेळ लागला. आमच्यातील एकाने याच ठीकाणी आपली ट्रेक संपवली. आम्ही तिथे पोचलो तेव्हा आमच्या पुढे असणारा एक ग्रुप चढण्यासाठी स्ट्रगल करताना दिसला. त्यांनी आपली पादत्राणे खाली काढून ठेवली होती. कदाचित त्यांना त्यांच्या शुजवर विश्वास नसावा. हा कातळी कडा अंदाजे १२० फुटाचा असावा. लेण्याच्या प्रवेश द्वारापासून खालपर्यंत एक दोर लटकत होता. हा कडा तीन टप्प्यात पार करायचा होता. देवाचे नाव घेऊन पहीला टप्पा चढायला सुरूवात केली. तो चढताना सुरूवातीला जेमतेम एक पाय राहील एवढ्या आकाराच्या दगडात कोरलेल्या खाचा होत्या. एका हाताने दोरीला पकडत हळूहळू चढू लागलो. सगळ्यात पुढे अंकुश, नंतर मी आणि शेवटला मिलिंद. ते चढल्यानंतर एक वेळ अशी आली की लोखंडी सळीला पकडून एक मोठ्या दगडातून वर चढायचे होते. इथून मात्र मला परत खाली जावसं वाटले. अंकुशने तो पँच पार केला होता. माझा धीरच होत नव्हता. छोटीशी एक चुकी मला सरळ दरीत घेवून जाणारी होती. सगळी हीम्मत एकटवत वरच्या दगडी खाच्यात पाय ठेवला. एका हाताने दोरीला पकडत अक्षरक्ष झोपून स्वताला वरच्या दिशेला झोकून दिलं. मी हे केलं यावर माझा विश्वास बसेना. एक टप्पा पार केला होता. इथेच एक संगमरवरी दगडात कोरलेल्या पादुकांची फरशी बसवलेली आहे. त्या पादुका कोणाच्या त्या बद्दल काही माहीती मिळाली नाही.
दुसरा टप्पा थोडा कमी रिस्की होता पण एका हाताने लोखंडी सळी पकडत कड्याच्या कपारीत पाय ठेवून हळूहळू वर सरकायचे होते. वर भैरोबा होताच. त्याकडे एकदा बघून तेही पार केले. हे सगळे करत असताना मागे वळून खाली बघायची हीम्मत काही माझी झाली नाही.
आता सर्वात कठीण टप्पा पार करायचा होता. विजय समीप होता. हा सरळसोट कडा चढायला शिडी देखील लावणे कठीण होती. १० फुटाचे हे अंतर पार करणे आव्हानात्मक होतं. इथे एका झाडाचे खोड उखळीत बसवले आहे. खोडाच्या खालच्या बाजूला लोखंडी सळीने बांधले असल्यामुळे जास्त खोल नसलेल्या उखळीतून झाडाचे खोड निसटण्याची शक्यता कमीच होती. हे काळे तुळतुळीत, टणक खोड कोणत्या झाडाचे आहे हे मात्र कळले नाही. त्याची वरची बाजू मोकळी असल्याने आपल्या वजनाने ते सहजपणे झुलते. त्याच्या छाटलेल्या फांद्यांचा आधार शिडीसारखा चढायला होतो. थोडक्यात हे उंचावर जावून रतांब्याच्या झाडावर चढण्यासारखे होते. बाजुला एका हाताने दोर आणि लोखंडी सळीचा आधार घेत सुरक्षेची साधने नसतील तर निव्वळ आणि निव्वळ देव आणि नशिबावर विसंबून चढावे लागते. पु्र्णपणे लक्ष केंद्रीत करून ही चढाई करावी लागते. यात माकडे व्यत्यय आणू शकतात. आमच्या एका सहकाऱ्याच्या बाबतीत असचं झालं तो चढत असताना एक माकड अगदी जवळ आलं होतं. झाडाच्या खोडाचा अंदाज घेतल्यावर असं लक्षात आलं की खोड आणि फांद्या लोखंडा इतक्याच मजबूत होत्या. ( त्या झाडाच्या खोडाचा फोटो काढणे खुपच कठीण होतं त्यामुळे त्याचा फोटो काढता आला नाही.) पायावर विश्वास ठेवत एक एक फांदी पार केली. शेवटच्या फांदीवर एक पाय ठेवत दुसरा पाय लेण्याच्या भागावर ठेवला, आणि आम्ही सर्वात कठीण ट्रेक पुर्ण केली होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर जिंकल्याचा आनंद ओसंडून वाहत होता. सुमारे चार तासानंतर हे साध्य झालं होतं. बरोबर एक वाजता आम्ही वर पोचलो होतो. आता मागे वळून पाहायला काहीच हरकत नव्हती. खाली पाहीले तर डोकं गरगरायला लागलं. अगदी खाली वाकून बघीतलं तरच आम्ही वर चढलो ती वाट दिसत होती. यावरून कड्याची चढण लक्षात येऊ शकते.
बहीरीच्या या लेण्यात बहिरोबाचे ( भैरोबा ) मंदिर आहे. तसेच या बहिरीच्या गुहेत बहिरीचा शेंदुर फासलेला दगड आहे. बहिरीची ही गुहा चांगली वीसेक मीटर लांब, सहा-सात मीटर रुंद आणि तीन ते चार मीटर उंच आहे. ठाकरांचा आकर उकार नसलेला शेंदुर फासलेला नवसाला पावणारा अनगड देवही या गुहेत बसला आहे. एवढय़ा उंच कातळातही पाण्याने काठोकाठ भरलेल्या दोन टाक्या आहेत. पाण्याची चव अप्रतिम आहे. या टाक्यांमध्येच गावकऱ्यानी जेवणासाठी काही भांडी ठेवली आहेत. जेवण झाल्यावर ही भांडी धुवून पुन्हा या टाक्यातच ठेवली जातात. ही भांडी चोरली तर बहिरी कड्यावरुन ढकलुन देतो. असे बोलले जाते. त्यामुळे तेवढं धाडस अजुन कोणी केलेलं नाही म्हणून भांडी अजुन शाबुत आहे.
डोंगरदरीत राहणारे आदिवासी ठाकर ही दुर्गम वाट चढून वर येतात. पूजाअर्चा-नैवेद्य करतात दिवस मावळायच्या आत खाली उतरतात. ढाकच्या बहिरिला कोबड्याचा बळी दिला जातो.
ढाकच्या भैरोबा विषयी जास्त माहिती मिळत नाही. पण एक विशेष गोष्ट कळली ती म्हणजे हा बहिरी फार रागीट आहे. याला‘ स्त्री’ येथे आलेली चालत नाही, असे म्हणतात की तो आलेल्या स्त्रीला पाताळस्पर्शी दरीत ढकलून देतो. म्हणून येथील गावकरी स्त्रियांना ढाक बहिरीवर जाण्यास मनाई करतात. पण हे कितपत खरे आहे यावर अजून शंका आहे. कारण 25 वर्षा पूर्वी येथे आदिवासी महिला पुजारी होती.
गुहेच्या वर दीड हजार फूटांची कातळभिंत आहे. इथून आजूबाजूच्या निसर्गाचे घडणारे दर्शनही फार विलोभनीय आहे. गुहेच्या समोरच राजमाचीचे श्रीवर्धन आणि मनरंजन हे दोन बालेकिल्ले दिसतात. येथूनच नागफणीचे टोक , प्रबळगड , कर्नाळा, माथेरान असा विस्तीर्ण परिसर दिसतो. दुसर्या लेण्यात काहीही अवशेष नाहीत ,तर ३ रे लेणे अर्धवट खोदलेल्या स्थितीत आहे. लेण्याच्या एका टोकाला एक मोठा कळकराय नावाचा सुळका आहे. कळकरायच्या सुळक्यावर चढाई करण्यासाठी अनेक गिर्यारोहक इथे येतात. बहीरी लेण्याकडे येण्यासाठी पुण्याकडून याच सुळक्याच्या बाजूने एका घळीतून यावे लागते.
सहय़ाद्रीच्या रांगेतील हे नवल तसे अनेक वर्षे एक गुपित होते. ढाकच्या बहिरीचा हा चढउताराचा थरार या रहाळातील ठाकरांपुरताच होता. पण आज सहय़ाद्रीत भटकणारा प्रत्येक गिर्यारोहक एकदा तरी या ढाकच्या वाटेला भिडतो आणि या गुहेतून आमच्याच राकट देशाचे दर्शन घेतो.
असेच आम्ही दर्शन घेऊन दिड वाजता खाली उतरायला सुरूवात केली. उतरताना पण खुप काळजी घेऊन उतरायला लागत होते. एक चुकीचं पाऊल दरीत घेऊन गेलं असतं. कडा उतरून झाल्यावर एकवार लेण्याकडे बघून आम्ही खाली उतरायला सुरूवात केली. सुमारे १ तास उतरल्यावर सुंदर घनदाट जंगलात वनभोजनाला बसलो. मिलिंदच्या घरून आणलेल्या इडली, आंबोळ्या, चटणी आणि काळ्या वाटाण्याच्या सांबाऱ्यावर यथेच्छ ताव मारला. तिथून निघालो तेव्हा २.३० वाजले होते. ४ वाजता सांडशी पोचलो. थोडा आराम करून थरारक आठवणी मनात ठेवत परतलो.
जगदंब...
शब्दांकन - नितीन राणे ( कणकवली )
९००४६०२७६८

No comments:

Post a Comment